करमाळा प्रतिनिधी

श्रीराम प्रतिष्ठानच्या वतीने सालाबादप्रमाणे यावर्षी देखील सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून हा सोहळा दि. १० मे २०२६, रविवारी रोजी सायंकाळी गोरज मुहूर्तावर करमाळा येथे संपन्न होणार असल्याची माहिती प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष गणेश चिवटे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी बोलताना चिवटे म्हणाले की, प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात सामुदायिक विवाह सोहळा आयोजित केला जातो. मात्र यावर्षी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमुळे कार्यक्रमाची तारीख बदलून १० मे २०२६ अशी निश्चित करण्यात आली आहे. यावर्षीचा विवाह सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडणार असून महाराष्ट्रातील राजकीय, सामाजिक व धार्मिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभणार असल्याचे त्यांनी सांगितले.

तालुक्यातील नागरिकांनी आपल्या वधू-वरांची नावे या सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्यासाठी नोंदवावीत असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

गेल्या चार वर्षांपासून श्रीराम प्रतिष्ठानच्या माध्यमातून हा उपक्रम राबविण्यात येत असून मागील तीन वर्षांत सुमारे शंभर वधू-वरांचे विवाह यशस्वीरीत्या लावण्यात आल्याची माहिती चिवटे यांनी दिली. यावर्षी अधिकाधिक विवाह पार पाडण्याचा मानस असून प्रत्येक वधू-वरांना सर्व आवश्यक सुख-सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. तसेच येणाऱ्या वऱ्हाडी मंडळींसाठी विशेष व्यवस्था करण्यात येणार आहे.

यंदाच्या सामुदायिक विवाह सोहळ्यात नव वधू-वरांची आकर्षक अशी आगळीवेगळी मिरवणूक काढण्यात येणार आहे, वऱ्हाडी मंडळींसाठी दिवसभर स्वतंत्र जेवण व्यवस्थाही करण्यात येणार असल्याचे चिवटे यांनी सांगितले.

सर्वांच्या स्मरणात राहील असा भव्य व दिमाखदार विवाह सोहळा आयोजित करण्यासाठी प्रतिष्ठानचे सर्व सदस्य व पदाधिकारी कामाला लागले असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *