करमाळा तालुक्यातील गुरसळी येथील नागरिकांचा दीर्घकालीन प्रश्न मार्गी ; रस्त्याला २० लाखांचा निधी मंजुर

करमाळा प्रतिनिधी
गुरसळी येथील भंडारे वस्तीला मुख्य रस्त्याशी जोडणारा महत्त्वपूर्ण मार्ग गेली अनेक वर्षे रखडलेला होता. पावसाळ्यात या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत असल्याने पायी जाणेही कठीण होऊन बसत होते. शालेय विद्यार्थी, वयोवृद्ध नागरिक, महिलावर्ग तसेच आजारी व्यक्तींना रस्त्यावरील दुरवस्थेमुळे प्रचंड त्रास सहन करावा लागत होता. नागरिकांनी अनेकदा मागणी करूनही हा प्रश्न सुटत नव्हता. अखेर या रस्त्याचे भूमिपूजन आज भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सरचिटणीस व जिल्हा नियोजन समितीचे सदस्य गणेश चिवटे यांच्या हस्ते संपन्न झाले.
भंडारे वस्ती रस्त्यावरील अडचणींचा अंदाज घेत चिवटे यांनी काही दिवसांपूर्वी स्वतः स्थळ पाहणी केली होती. येथील परिस्थिती पाहून त्यांनी ग्रामस्थांना आश्वासन दिले होते की, जिल्हा नियोजन समितीमार्फत हा रस्ता लवकरच सुरू केला जाईल. स्वतः पाठपुरावा करून त्यांनी या कामासाठी निधी मिळवला आणि आज प्रत्यक्ष भूमिपूजन करून कामाला सुरुवात झाली आहे.

भूमिपूजनावेळी बोलताना गणेश चिवटे म्हणाले की, “मी गेल्या भेटीत हा रस्ता अतिशय बिकट अवस्थेत पाहिला होता. ग्रामस्थांचा त्रास लक्षात घेऊन मी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे मागणी केली. त्यांनी तातडीने या रस्त्यासाठी २० लाख रुपये मंजूर केले. या निधीमुळे रस्त्याचे काम आता जलद गतीने होणार असून काही दिवसांत हा रस्ता पूर्णपणे तयार होईल.”
त्यांच्या या प्रयत्नामुळे गुरसळी व भंडारे वस्तीतील नागरिकांची अनेक वर्षांची अपेक्षा पूर्ण होत आहे. रस्त्याचे काम सुरू झाल्याने ग्रामस्थांमध्ये मोठया प्रमाणात समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून सर्वत्र गणेश चिवटे यांचे आभार व्यक्त केले जात आहेत.
या भुमिपुजन प्रसंगी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अफसर तात्या जाधव, रामभाऊ ढाणे, तालुकाध्यक्ष काकासाहेब सरडे, उपाध्यक्ष बंडू शिंदे, अमोल पवार, सोमनाथ घाडगे, सचिन गायकवाड, नाना अनारसे, बंडू शिंदे, महेश दिवाण, संजय दुरगळे, अशोक मोरे, वसीम सय्यद यांच्यासह गुरसळी येथील चेअरमन महावीर कळसे, आदम शेख, सरपंच प्रमोद भंडारे, उपसरपंच योगेश भंडारे, राजेंद्र भंडारे, शिवाजी पाटील, दिगंबर भंडारे, सतीश बागल, तानाजी भंडारे, प्रताप पाटील, दत्तात्रय भंडारे, हरिभाऊ भंडारे, महादेव भंडारे, रामभाऊ माने, राहुल जाधव, रणजीत भंडारे, शिवाजी बागल, संजय कुलकर्णी, गणेश महाडीक, भरत गुंड, किरण शिंदे, विनोद इंदलकर आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.