
करमाळा प्रतिनिधी
सीना कोळगाव धरण प्रकल्पा मुळे बाधित झालेल्या ७३२ धरणग्रस्त कुटुंबाना पर्यायी जमीन वाटप करण्यात यावी या मागणीचे लेखी निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भारतीय जनता पार्टी प्रदेश उपाध्यक्ष रश्मी दिदी बागल यांच्या नेतृत्वाखाली श्री मकाई सह साखर कारखाना संचालक व सीना कोळगाव धरणग्रस्त संघटनेचे अध्यक्ष सतीश बापू नीळ यांनी समक्ष भेटून दिले.
पुणे येथे पश्चिम महाराष्ट्राच्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक नियोजन बैठकीच्या वेळी मुख्यमंत्री पुणे येथे आल्यानंतर त्यांची भेट घेऊन त्या मागणीचे निवेदन देण्यात आले.

या मागणीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढील तात्काळ कार्यवाही करण्यासाठी सबंधित अधिकारी यांना निर्देश दिले आहेत. यावेळी केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील, माधुरी ताई मिसाळ, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, ग्रामविकास मंत्री तथा पालकमंत्री जयकुमार गोरे, बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले, भाजपा प्रदेश अध्यक्ष रविंद्र चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना नीळ यांनी सांगितले की, गेल्या पंचायत समितीच्या निवडणुकीत माझा अल्प मताने पराभव झाला आहे. भविष्यात आपण निवडणूक लढवण्यासाठी आदेश दिले तर मी निवडणूक लढवण्यास तयार आहे, परंतु आमच्या ७३२ धरणग्रस्त शेतकरी बांधवांना पर्यायी जमिनी मिळणे गरजेचे आहे. अशीही मागणी केली आहे. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक काशिनाथ दादा काकडे, श्री मकाई सह साखर कारखाना संचालक आशिष गायकवाड, राजेंद्र मोहोळकर, मंडल अध्यक्ष सचिन बापू पिसाळ, गणेश झोळ, अजित झांजुर्णे, महेश तळेकर, महावीर आबा तळेकर, रंगनाथ शिंदे, राणा वाघमारे, सरपंच संदीप शेळके, युवराज मगर, स्वप्नील गोडगे, उपसरपंच संतोष कांबळे व इतर मान्यवर उपस्थित होते.