करमाळा प्रतिनिधी

करमाळा तालुक्यातील महत्त्वाचा संगोबा पुल वाहतुकीसाठी बंद असल्याने शाळा, महाविद्यालयीन विद्यार्थी तसेच प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल होत होते. या प्रश्नावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष भरत अवताडे यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी ठाम भूमिका घेतली. बोरगाव सरपंच (प्रतिनिधी) विनय ननवरे यांच्या सूचनेनुसार व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाउपाध्यक्ष आशपाक जमादार यांच्या उपस्थितीत करमाळा आगार प्रमुखांना निवेदन देण्यात आले.

या निवेदनात “संगोबा पुल सुरक्षित असून येथून बससेवा तातडीने सुरू करावी” अशी मागणी करण्यात आली. त्यानंतर महामंडळाने तात्काळ दखल घेतली. विशेष म्हणजे दुपारी चार वाजता पाडळी गाडी सोडण्याचे आदेश देण्यात आले असून उद्यापासून (४ ऑक्टोबरपासून) नियमित बससेवा सुरू करण्याचे आश्वासन महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी ग्रामस्थांना दिले आहे.

याआधी महामंडळाने पुलावरील रस्ता सुरक्षित असल्याचे प्रमाणपत्र बांधकाम विभागाकडून मागवले होते. ग्रामस्थांच्या प्रयत्नांमुळे हे प्रमाणपत्र त्वरित उपलब्ध करून देण्यात आले. त्यामुळे बससेवा सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

ग्रामस्थांनी या निर्णयाचे समाधान व्यक्त केले असून विद्यार्थ्यांच्या शिक्षणासह प्रवाशांच्या दैनंदिन सोयींना यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे. या प्रसंगी ग्रामस्थ, सामाजिक कार्यकर्ते व स्थानिक नेते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हा निर्णय त्वरित लागू झाल्याने संगोबा परिसरातील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण असून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी करमाळा तालुक्याचे पाठपुराव्याचे कौतुक होत आहे.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *