करमाळा प्रतिनिधी
बदलापूर येथे अल्पवयीन मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेमुळे विद्यार्थिनी व पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अशा विकृत मनोवृत्तीला आळा घालण्यासाठी पोलिसांनी शाळा, महाविद्यालय, खाजगी क्लास, रिक्षाचालक, स्कूल बसचालक, राजकीय, सामाजिक कार्यकर्ते, पोलीस मित्र यांचे संवाद मिळावे घेऊन मुलींच्या सुरक्षेबाबत मार्गदर्शन करावे, या मागणीचे निवेदन प्रहार जनशक्ती पक्ष/ शेतकरी संघटनेच्या वतीने प्रहार तालुका उपाध्यक्ष सोमनाथ जाधव यांनी प्रहार जिल्हाध्यक्ष सोलापूर दत्ताभाऊ म्हस्के पाटील यांच्या मार्गदर्शनात महिला कृती समितीचे पदाधिकारी यांच्या समवेत तसेच प्रहार पदाधिकारी करमाळा व उपस्थित नागरिकांच्या वतीने करमाळा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक घुगे यांना देण्यात आले. कायदा व सुव्यवस्थेबाबत सद्य: स्थितीत समस्या व उपायोजनावर विचारमंथन करावे. रोडरोमियो वर पोलिसांचा वचक बसावा म्हणून बीट मार्शल यांना जबाबदारी देण्यात यावी. तसेच गुन्हा घडण्यापूर्वी समाजकंटकांवर कारवाई करण्याची मागणीही या निवेदनात केली आहे. प्रहार चे तालुका उपाध्यक्ष सोमनाथ जाधव म्हणाले की, प्रत्येक शाळेमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात यावेत. एखादी घटना घडून गेल्यानंतर शोक करण्यापेक्षा ती घडू नये, यासाठी सर्वांनी खबरदारी घेणे गरजेचे आहे. यावेळी कोर्टीच्या माजी सरपंच नलिनी जाधव, अर्बन बँकेच्या माजी उपाध्यक्ष माधुरी परदेशी, क्षितिज ग्रुपच्या डॉ. सुनिता जोशी, मंजू देवी, ब्राह्मण संघाच्या महिला अध्यक्षा नीलिमा पुंडे, नगरसेविका राजश्री माने, राष्ट्रवादी काँग्रेसच्या विजयमाला चवरे, प्रहार चे तालुका उपाध्यक्ष सोमनाथ जाधव, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संतोष वारे, आदी पदाधिकारी तसेच प्रहार चे कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.