वाटसरूचा प्राण घेणा-या पांडेओढा पुलाची दुरुस्तीची ग्रामस्थांची मागणी
करमाळा प्रतिनिधी
करमाळा- गुळसडी रस्त्यावर असणाऱ्या महत्वाच्या नादुरूस्त पांडेओढा पुलाची दयनीय अवस्था झाली असुन गतवर्षी एकाचा या ओढ्याला आलेल्या पुरात वाहून जाऊन मृत्यु झाला होता. तात्काळ या पुलाची उंची वाढवून या पुलाची दुरुस्ती करून खराब रस्ता दुरूस्त करण्याची मागणी पंचक्रोशीतील नागरिकांनी केली आहे. गेल्या पावसाळ्यामध्ये गुळसुडी येथील एका ऊस तोडणी करायला आलेल्या बिड येथील मजुराचा या अनपेक्षित ओढ्याला आलेल्या पुरात वाहून जीव गेला होता. याचवेळी पांडेओढा पुलही वाहून गेला होता. या रस्त्यावरची वाहतूकही त्यावेळेस ठप्प झाली होती. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने जेसीबीच्या सहाय्याने किरकोळ डागडुजी करून हा रस्ता वाहतुकीसाठी दुरुस्त करून सुरू केला होता.
आता पावसाळ्याची सुरुवात दोन महिन्या वर आली आहे. मात्र अद्यापही या पांडेओढा पुलाची दुरुस्ती चे कायमस्वरूपी काम करण्यात आलेले नाही. सध्या दहिगाव उपसा सिचंनचे पाणी वितरिकेमधुन म्हणजे कॅनलमधून सुटलेले आहे. पाण्याचे प्रमाण वाढल्यानंतर याच पुलावरून हे पाणी वाहण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा पूल पुन्हा धोकादायक स्थितीत येण्याची शक्यता आहे. थोडा पाऊस झाला व ओढ्यात थोडे पाणी आले की गार्डस्टोनवरून पाणी वाहते. त्यामुळे येणा-या जाणा-यांना वाहत्या पाण्याचा अंदाज येत नाही त्यामुळे प्रवाशांचा जिव धोक्यात येत आहे. या पुलावरून गुळसडी ,सौंदे, वरकटणे, केम आदी वीस ते पंचवीस गावातील ग्रामस्थांचा प्रवास दररोज सुरू असतो. मात्र या अत्यावश्यक असणाऱ्या पुलाची उंची याआधीच वाढवणे गरजेचे असताना त्याची उंची न वाढवल्याने अतिवृष्टी मध्ये झालेल्या पावसाने एकाला जीव गमवावा लागला होता. यावेळी
अतिपाण्यामुळे हा पुलच चक्क वाहून गेला होता. या पुलाची उंची कमी असल्याने येथून पायी जाणारे दोघे तरुण या पाण्यात वाहून गेले होते. यामध्ये एकाला बेपत्ता होऊन प्राण गमवावे लागले होते तर एक जण बचावला होता. दुसऱ्या दिवशी मृतदेह झाडामध्ये अडकलेले अवस्थेत पोलिसांनी शोधून काढला होता. दरम्यान या पुलाची तात्काळ दुरुस्ती करावी. नाहीतर अतिवृष्टी झाल्यास या पुलातून पाणी मावत नसल्याने या पुलाची अवस्था धोकादायक ठरणार आहे. या पुलाची उंची वाढवावी तसेच करमाळा, गुळसडी, केम या मार्गावरून गावाला जाणाऱ्या रस्त्यावर मोठ-मोठाली खड्डे पडल्याने ते खड्डे बुजवावेत. अशी मागणी या भागातील ग्रामस्थांनी केली आहे.
पांडेओढा पुलाची पावसाळ्यापूर्वी दुरूस्ती करणे गरजेचे आहे. मोठा पाऊस झाला तर ओढ्याला पुर येणार आहे. रस्त्यावर ची केम पर्यतची २५ किमीची वाहतुक ठप्प होणार आहे. एका परजिल्ह्यातील मजुराचा जिव यावेळी आलेल्या पुरात व पुल वाहुन जाऊन झाला होता. पुन्हा दुर्घटना होण्याची शक्यता आहे. तात्काळ पुलांची उंची वाढवून मजबूत व सुरक्षित पुल उभा करावा.
सनी धेंडे, सामाजिक कार्यकर्ते, करमाळा
गुळसडी रस्त्यावरील वाहुन गेलेल्या पांडेओढा पुलाच्या कामासाठी पुरवणी प्रस्ताव शासनाकडे सादर केला आहे. वरीष्ठाकडून मंजुरी येताच प्राधान्याने या पुलाचे काम मार्गी लावू.
के.एम.उबाळे, उपअभियंता, सा.बा.विभाग, करमाळा